पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी येथील जुन्या कात्रज बोगद्याजवळ रविवारी दुपारी कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कोंढवा येथील शेख कुटुंब रिक्षाने खेड शिवापूर येथील दर्ग्यावर दर्शनासाठी जात असताना, दुपारी साडेतीनच्या सुमारास (३.५५ वाजता) पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा दोन वेळा उलटली. अपघातात उबेद (१०) आणि अहमद (१३) या दोन भावांचा मृत्यू झाला. कासिम शेख (२७), त्यांची पत्नी अलीशा (२१), मुलगी इनाया (१) आणि उबेद-अहमदचा लहान भाऊ बिलाल (८) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर पोलिसांनी कारचालक प्रसाद कुलकर्णी (४०, राहणार वाघोली) याला निष्काळजीपणे व वेगात गाडी चालवून मृत्यू व दुखापत घडवल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी सांगितले की, “कार चालकाला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे”.
या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews