महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – यांनी एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मराठी एकजुटीच्या ताकदीमुळे राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, “ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी आहे. यापुढे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील, तेव्हा प्रत्येक वेळी सरकारला मागे हटावे लागेल.” त्यांनी सांगितलं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा होताच सरकारने धसका घेतला होता. लाखो मराठी लोक या मोर्चात सहभागी होणार होते, त्यामुळे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला.
राऊत यांनी फडणवीस सरकारवर टीका करत म्हटलं, “फडणवीस-शिंदे, फडणवीस-हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर दोन भाऊ एकत्र आल्यावर तुम्हाला पोटदुखी का होते? एकाच विचाराचे नेते एकत्र आल्यावर तुम्हाला नैराश्य येतंय.” त्यांनी त्रिभाषा सूत्राबाबतही सरकारवर टीका केली आणि असा निर्णय मराठी माणसांसोबत ‘खेळ’ असल्याचं म्हटलं.
५ जुलैला होणाऱ्या मोर्चाची तयारी दोन्ही पक्षांकडून सुरू झाली होती, मात्र सरकारने निर्णय मागे घेतल्यामुळे आता हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, “ही मराठी एकजुटीचा विजय आहे. ठाकरे हाच ब्रँड!”
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठी जनतेत समाधान व्यक्त होत असून, पुढेही मराठीच्या हक्कासाठी ठाकरे बंधू एकत्र राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews