अहिल्यानगर (माजी अहमदनगर) येथील एका शाळेत बुधवारी दहावीच्या विद्यार्थ्याचा आठवीच्या विद्यार्थ्याकडून चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या दुपारच्या सुट्टीत क्रिकेट खेळताना वाद झाला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. वाद वाढल्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने पोट आणि डोक्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दोन्ही विद्यार्थी सरजेपुरा परिसरातील रहिवासी आहेत. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासूनच वाद होता. या वादातूनच मुलावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठवीच्या विद्यार्थ्यास ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शाळेतील शिक्षकांनी मृत विद्यार्थी हुशार आणि खेळात सक्रिय असल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews